मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल असून त्यांच्याजवळ जाणारा संपला आहे. हवंतर त्यांचा राजकीय इतिहास तपासा, अशी टीका शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे.
आयोगाच्या निर्णयावर बोलताना शिवतारे यांनी,”शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार असून त्यांना यातून स्वत: चा फायदा करून घ्यायचा होता,” असेही शिवतारे यांनी म्हटले. त्यांना शिवसेना-भाजप युती नको हवी होती. यासाठी पवार यांनी भाजपला 2014 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे ही शिवतारे यांनी म्हटले.
तसेच माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्या जोरदार टीका केली. निवडणूक आयोग घेणार असलेला निर्णय शरद पवार यांना अपेक्षित होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल, त्याचे स्वागत करायला हवे असे म्हटले होते. हे मोठे नेते कोणते डाव टाकतील हे सांगता येत नसल्याचे शिवतारे यांनी म्हटले.
शरद पवार यांनी कधीही शिवसेनेशी जुळवून घेतले नाही. शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री असली त्यांचे राजकीय मतभेद होते. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या मोहातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत शरद पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले. हा इतिहास तुम्ही पाहा, असेही शिवतारे यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, वर्ष 2019 मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणायला लावला. त्यानंतर राज ठाकरे यांची गरज संपल्यावर त्यांना दूर झटकले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.