पिंपरी(प्रतिनिधी) – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. कसे राजकारण करावे, याबाबत ते हुशार आहेत. त्यांचे दुर्दैव हे की गेल्या 50 वर्षात त्यांना एकही चंद्रगुप्त तयार करता आला नाही. मात्र, कालांतराने असे लक्षात आले की चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्यही तेच आहेत, असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी (दि. 22) चिंचवड येथे व्यक्त केले.
कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात पाटेकर यांची मुलाखत समीरण वाळवेकर यांनी घेतली. त्या प्रसंगी त्यांनी नाटक, चित्रपट क्षेत्रातील प्रवास आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सदाशिव खाडे, उमा खापरे, आझम पानसरे, संयोजक अमित गोरखे, अनुराधा गोरखे, मधुकर बाबर आदी
उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये सर्वच सुंदर आहे. कोणत्याही पक्षाची नियमावली काढली तर त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली कोण कशी करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणुकीआधी सर्व पक्षांमध्ये आचारसंहिता असते. सत्तेत आल्यानंतर मात्र ते सत्ताधारी होऊन जातात. सामान्य व्यक्ती मत देतो तर त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरायला नको.