प्रभात वृत्तसेवा बारामती – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी महायुतीने लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटले होते. तसेच बिहार निवडणुकीत मतदान महिलांनी हाती घेतले. निवडणुकीदरम्यान प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पडले. त्याचाच परिणाम बिहार निवडणुकीच्या निकालावर दिसत आहे. या निवडणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. शरद पवार हे बारामती येथील दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी पारदर्शक व स्वच्छ वातावरणातील निवडणूक, रेवडी वाटप यावर चिंता व्यक्त करीत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगून भाजपाशी युती नको, या वक्तव्याला पवार यांनी बगल दिली.पवार म्हणाले की, आता प्रश्न असा आहे की, यापुढच्या निवडणुकीत ज्याच्या हातात सत्ता आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी पैशाचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं, ही भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल, याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. दहा- दहा हजार रुपये वाटणं ही काय लहान रक्कम नाही. 50 वर्षांपूर्वी वाटप हे लहान प्रमाणात होते. ते म्हणाले, देशात सर्वच राज्यांत 50 टक्के मतदान हे महिलांचे आहे. त्यांना दहा-दहा हजार रुपये देणं आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणं, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात होतात का? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. स्थानिकांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत पवार म्हणाले, कुठे कुठे युती झाली आहे. मला माहित नाही, माझ्या पक्षापुरते मी सांगतो की, आमच्यात अशी चर्चा झाली आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही पक्ष म्हणून जात नाही. त्या- त्या तालुक्यात जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. हा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे, असे पवार यांनी सांगून दोनच दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला बगल दिली आहे.