प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – हेळवाक जिल्हा परिषद गटातील तीनही जागा निवडून आणणे काहीही अवघड नसून, योग्य नियोजन, मजबूत संघटन आणि करेक्ट कार्यक्रमाच्या जोरावर हेळवाक गट व दोन्ही पंचायत समिती गणांवर भगवा फडकवणारच, असा ठाम निर्धार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. कोयना विभाग हा कुणाचाही बालेकिल्ला नसून, विकासाच्या जोरावर जनतेचा विश्वास आपल्या बाजूने असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. हेळवाक जिल्हा परिषद गट तसेच येराड व हेळवाक पंचायत समिती गणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या येराड येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.पालकमंत्री देसाई म्हणाले, “पाटण तालुक्यात मी दोन कोटींची नव्हे तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. काही जण दोन कोटींच्या निधीवर राजकारण करतात; पण मी जनतेला ताकद देण्यासाठी विकासकामे राबवत आहे. त्यामुळेच तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठाम उभी आहे. पाटणमध्ये निधी नव्हे, विकास बोलतो’ हीच आमची राजकीय चौकट असल्याचे त्यांनी नमूद केले. मंगळवारी डोंगरी भागातील गावांच्या मूलभूत प्रश्नांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहून स्वतंत्र डोंगरी परिषद आयोजित केली आहे. या डोंगरी परिषदेत पाणी, वीज आणि रस्ता यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने निर्णय घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यात जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, गणेश साळुंखे, राम पवार यांची भाषणे झाली. त्यांनी संघटन अधिक बळकट ठेवण्यावर भर देत विकासकामांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. दिलीप साळुंखे यांनी आभारमानले. या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, अशोकराव पाटील, गणेश साळुंखे, राम पवार, मनीष चौधरी, रमेश जाधव, शैलेंद्र शेलार, सरपंच गजानन कदम, येराडचे सरपंच भारती साळुंखे व दिलीप साळुंखे, बळीराम साळुंखे यांच्यासह हेळवाक गट व दोन्ही गणांतील पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.