पिंपरी – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक शैलेश मोरे यांच्या वतीने चिंचवडस्टेशन-आनंदनगर येथे गेल्या 15 दिवसांपासून दररोज सकाळी साडेतीन हजार आणि सायंकाळी साडेतीन हजार अशा एकूण सात हजार लोकांना जेवण दिले जात आहे. तसेच, येथील दोन हजार लोकांना शिधा वाटप देखील करण्यात आला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येथील नागरिकांना त्यामुळे मोठा आधार मिळाला आहे.
शैलेश मोरे यांनी यापूर्वी 25 मार्चपासून 1200 ते 1300 लोकांना जेवण देत होते. तर, गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी दररोज सात हजार लोकांना जेवण सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आनंदनगरचा परिसर हा सध्या करोनाचा हॉटस्पॉटफ ठरतो आहे. महापालिकेने या परिसराचा प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) समावेश केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना बाहेर ये-जा करणे मुश्किल झाले आहे. परिसरातील बरेच नागरिक हे हातावर पोट असणारे आहेत. त्यामध्ये बिगारी कामगार, रोजंदारीवर जाणारे कामगार, धुणी-भांडी करणाऱ्या महिला आदींचा समावेश आहे.
त्यांच्या हाताचे काम गेल्याने सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील जमाव दहा दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरला होता. परिसरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे आधीच जेरीस आलेल्या नागरिकांनी आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी लावून धरली होती.
याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच, सुरक्षित अंतर राखुन प्रत्येकाने आपले प्रश्न मांडावे, असे सांगितले. आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले होते. नगरसेवक शैलेश मोरे यांनी पुढाकार घेत, सर्वाना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. या आधीही मी तुमच्यासाठी धावून आलेलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखे होईल, असे आवाहन केले. त्यानंतर जमाव शांत झाला होता.
शैलेश मोरे म्हणाले, निगडी-प्राधिकरणातील स्थानिक नगरसेवकांनी आनंदनगरच्या नागरिकांना प्राधिकरणातील शैक्षणिक संस्थेत क्वारंटाईन करण्यास विरोध करून त्यांची अवहेलना केली होती. ही बाब चुकीची व माणुसकीला धरून नव्हती. त्यामुळे मी त्याबाबत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
शहरातील सर्वच भागात करोना संशयितांसाठी महापालिकेने क्वारंटाईन केंद्र तयार केले आहे. संशयितांना क्वारंटाईन करण्यास तेथील नागरिकांनी कोणतीही हरकत घेतलेली नसताना, प्राधिकरणातील सुशिक्षित नगरसेवक व नागरिकांकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती. करोना उच्च-नीच काहीच पाहत नाही. उद्या जर हीच वेळ प्राधिकरणातील नागरिकांवर आली तर, आम्हीही त्यांना विरोध करायचा का? स्थानिक नगरसेवकांनी व नागरिकांनी यावर समोपचाराने तोडगा काढायला हवा होता. सर्वच ठिकाणच्या नगरसेवकांनी व नागरिकांनी विरोध करायचे ठरवले तर, शहराचे वाटोळे होईल. विरोधाने विरोधच वाढतो. शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी आपले शहर करोनामुक्त कसे होईल? याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
आनंदनगर परिसरात साडेतीन हजारांपेक्षा अधिक घरे आहेत. येथे सुमारे 15 हजार नागरिक राहतात. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे मी माझ्या वतीने जमेल तशी मदत येथील नागरिकांना केली. गेल्या 15 दिवसांपासून दररोज सात हजार लोकांना जेवण सुरू केले आहे. यापुढे देखील माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी करीतच राहणार आहे.
– शैलेश प्रकाश मोरे,
नगरसेवक, प्रभाग क्रमांक 19