लातूर: कर्जातून मुक्त होण्यासाठी एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला आणि या अमानुष कटात लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाला जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उघडकीस आली आहे. लातूर पोलिसांनी केवळ २४ तासांत या घटनेचा छडा लावून सत्य समोर आणले. औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेटून पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीतील चालक होरपळून मरण पावला असून, मृतदेह औसा तांडा येथील गणेश चव्हाण याचा असल्याचे वाहनातील वस्तूंवरून भासविण्यात आले होते. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गणेश चव्हाण याचे कॉल डिटेल्स तपासले असता धक्कादायक सत्य उघड झाले. गणेश चव्हाण जिवंत असून, त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून पलायन केल्याचे स्पष्ट झाले. पैशासाठी रचला अमानुष कट: खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या गणेश चव्हाणवर मोठे कर्ज होते आणि आर्थिक व्यवहार अडचणीत आले होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने एक कोटीचा विमा उतरवला आणि स्वतःच्या मृत्यूचा कट रचला. त्याने तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणाऱ्या वृद्ध व्यक्ती गोविंद यादव यांना गाडीत बसवले, त्यांचा खून केला आणि मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवून गाडीला आग लावली. मृतदेह आपलाच आहे हे पटवून देण्यासाठी त्याने आपले कडे (कंगन) मृतदेहाजवळ ठेवले होते. पोलिसांनी संशयावरून तपास केल्यावर चव्हाण पकडला गेला. या घटनेत निरपराध वृद्धाचा बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीविरुद्ध खुनासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.