पुणे : महाराष्ट्राच्या समाजसेवा आणि श्रमिक चळवळींचे प्रणे असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (बाबासाहेब पांडुरंग आढाव) यांचे आज पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आयसीयूत दाखल होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा, विशेषतः कष्टकरी आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांचा एक मोठा आवाज हरपला आहे. बाबा आढाव कोण होते? डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (१९२९–२०२५) हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे एक खंदे योद्धे आणि श्रमिक-कष्टकऱ्यांचे खरे कैवारी होते. पुण्यात जन्मलेले बाबा आढाव १९७० च्या दशकात पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते आणि समाजवादी पक्षाचे सक्रिय सदस्य होते. रिक्षा चालक, हमाल, माथाडी कामगार यांच्यासाठी त्यांनी ‘हवालदार पंचायत’ स्थापन केली आणि आयुष्यभर त्यांच्या हक्कांसाठी लढले. बाबा आढाव यांच्या मोहिमा आणि योगदान एक गाव एक पाणवठा : जातीय भेदभाव संपवण्यासाठी आणि दलित-बहुजनांना पाणवठ्यावर समान हक्क मिळावा यासाठी त्यांनी राज्यव्यापी मोहीम उभी केली. ही मोहीम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात क्रांती घडवणारी ठरली. श्रमिक चळवळ : हमाल-माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक उपोषणे आणि आंदोलने केली. जातीयविरोधी लढा : अस्पृश्यता, जातीय भेदभाव यांच्याविरुद्ध आयुष्यभर लढणारे बाबा आढाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे कट्टर अनुयायी होते. निवडणूक सुधारणा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करत त्यांनी उपोषण केले. “लोकशाही वाचली पाहिजे” ही त्यांची शेवटची मोहीम होती. सध्याच्या राजकारणावर परखड मत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीवर बोलताना बाबा आढाव म्हणाले होते की, आज सकाळी एका पक्षात असणारा संध्याकाळी दुसऱ्या पक्षात दिसतो. सत्तेची भूक इतकी प्रचंड आहे की माणसं पक्ष, विचार, तत्त्वे सगळं विसरतात. पण शेवटी १४० कोटी जनताच ठरवते, कोणाला काय करायचं ते. कॅनडातून माझी मुलं फोन करतात आणि विचारतात, ‘बाबा, भारतात काय चाललंय?’ मी त्यांना सांगतो, इथे फक्त सत्तेसाठी सगळं चाललंय, असं म्हणाले होते. डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे. असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. ‘माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ’ ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते. पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते. पुण्याचा खासदार या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा श्रद्धांजली संदेश “श्रमिकांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे बाबा आढाव यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. साधेपणा, तत्त्वनिष्ठा आणि न्यायासाठीच्या अविचल संघर्षामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या कार्यातून उभारलेली सहकार आणि श्रमिक चळवळ ही आपल्या समाजाची अमूल्य संपदा आहे. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.” माधुरी मिसाळ नगरविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र