लंडन – विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्याने त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे उपान्त्य फेरीतील चार संघ आणि त्यांच्यातील सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिला उपान्त्य सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होईल.
यावेळचा वर्ल्डकप हा रॉबिन राऊंड पद्धतीने खेळवण्यात आला. ज्यामुळे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे तसेच संघांचे लक्ष पॉईंट्सटेबलवर होते. अखेरीस पॉईंट्सटेबलमधील काही गणितांनी काही संघांना घरचा रस्ता दाखवला. यासाठी जाणून घ्या लीग स्पर्धेतील सामने संपल्यानंतर भारत पहिल्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार पॉईट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावरील संघ चौथ्या स्थानावरील संघाशी लढते तर दुसऱ्या स्थानावरील संघाचा मुकाबला तिसऱ्या स्थानावरील संघाशी होतो. याचा अर्थ आता भारताचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे तर ऑस्ट्रेलियाचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे.
यातील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 जुलै रोजी मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. त्यामुळे भारत-न्यूझीलंड सामना हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. तर, दुसरा सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये 11 जुलैला बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे.
उपांत्य फेरीतील सामन्यांचे टाईम टेबल
पहिली सेमीफायनल
भारत वि. न्यूझीलंड
9 जुलै (मंगळवार) मॅंचेस्टर
दुपारी 3 वाजता
दुसरी सेमीफायनल
ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
11 जुलै (गुरुवार) बर्मिंगहॅम
दुपारी 3 वाजता
स्पर्घेतील अखेरचा सामना लंडनच्या प्रतिष्ठित लॉर्डस मैदानावर 14 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता होणार आहे.