कोलकाता- भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी केले आहे. भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून समाजामध्ये धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करत असल्याचा आरोपही राजा यांनी केला आहे. “सीपीआय’च्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
नवीन नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिमांच्याच विरोधात नाही, तर गरिब, दलित, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्याही विरोधात आहे. भाजप आणि संघ मिळून देशात फूट पाडत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मिळून देशात फॅसिझम आणत आहेत, असेही राजा म्हणाले. भाजपच्या विरोधात “भाजप हटाओ, देश बचाओ’ अभियान “सीपीआय’च्यावतीने छेडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात सर्वसमावेशक, समानता आणि बंधुता संविधानामुळे आली. हे संविधान केवळ हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा मुस्लिमांसाठी नाही. तर भारतीयांसाठी आहे. हिंदूराष्ट्र निर्मितीचे भाजपचे हे षडयंत्र रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे, असेही राजा म्हणाले.