नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कृषी क्षेत्रावर फारसा दुष्परिणाम होणार नाही असे निती आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे मोठे दुष्पपरिणाम मे महिन्यात दिसून आले आहेत. त्या महिन्यात शेतीमध्ये फारशी कामे नसतात त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासावर त्याचा काहीही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.
ते म्हणाले की, गहु, तांदुळ आणि उस या पिकांसाठी देशातील धोरणे, किंमती आणि तंत्रज्ञान अतिशय पोषक असे आहे. तथापि डाळींची खरेदी किमान आधारभूत किंमतींवर करण्याची गरज आहे.े डाळींच्या पिकाखालील क्षेत्र वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. ते आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
करोनाचा प्रादुर्भाव देशातील विविध क्षेत्रांवर झाला. औद्योगिक उत्पादनही घटले. त्याच प्रमाणात कृषी क्षेत्रावरही याचा विपरित परिणाम झाला असण्याची चर्चा आहे. यावर बोलताना रमेशचंद म्हणाले की, मे महिन्याच्या काळात शेतीत फार कामे नसतात. प्रत्यक्ष पेरणीची कामे जून महिन्यात सुरू होतात. त्यामुळे शेतीवर या महामारीचा फार आघात झाला आहे असे म्हणता येणार नाही.
मे आणि जूनच्या मध्यापर्यंत शेतीकामासाठी मजुरांची वानवा निर्माण झाली तरी फारसे बिघडत नाही असे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर तीन टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.