-डॉ. मेघश्री दळवी
हवामान बदलाचे चटके आपण सोसतो आहोत. पुढे काय होणार याचे तर्क करतो आहोत. तापमानवाढ दीड अंशाच्या आत राखू शकलो तर आपण तुलनेत सुरक्षित आहोत. पण प्रत्यक्षात तापमानवाढ त्यापुढे जाणार आहे. दीडच्या जागी दोन ते तीन अंश असा आज अदमास आहे. तसं झाल्यास पृथ्वीवर काही अपरिवर्तनीय बदल घडून येतील आणि त्यातला एक आहे पर्माफ्रॉस्ट संपण्याचा.
पर्माफ्रॉस्ट म्हणजे कायमस्वरूपी गोठलेल्या बर्फाचा थर. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ आणि उंच पर्वतांवर असा वर्षभर गोठलेला बर्फ आढळतो. वाढत्या तापमानामुळे यातला उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट वेगाने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याचं मोठं संकट समोर दिसत आहे. त्यात भर म्हणून या पर्माफ्रॉस्ट थरात प्रचंड प्रमाणात साठून राहिलेला कार्बन वातावरणात जाण्याचा आणखी एक धोका निर्माण झाला आहे.
पर्माफ्रॉस्ट थरात अडकलेल्या वनस्पती आणि प्राणी-पक्ष्यांचे अवशेष पूर्णपणे विघटित होत नाहीत. या सेंद्रिय अवशेषांच्या रूपात तिथे कित्येक शतकं कार्बनडायऑक्साइड आणि मिथेन अडकून राहिलेला आहे. एका अभ्यासानुसार हे प्रमाण सतराशे अब्ज टन इतकं अफाट आहे. आज ज्या वेगाने आपण कार्बन उत्सर्जित करतो त्या वेगाने एवढा कार्बन वातावरणात जायला सत्तेचाळीस वर्षे लागतील. किंवा दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर हा सगळा कार्बन पर्माफ्रॉस्टमधून बाहेर पडला तर वातावरणातील कार्बनचं प्रमाण थेट दुप्पट होईल. त्याच्या दुष्परिणामाचा अंदाज बांधायला मग कठीण जाणार नाही.
संशोधकांच्या अनेक गटांच्या अंदाजानुसार आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट 2100 पर्यंत पूर्ण वितळून जाईल. तिथे जमीन खचण्याचा आणि महापुराचा धोका आहे. मानव आणि प्राण्यांना त्यात तग धरणे मुश्कील होईल. पण त्याहूनही मोठं भय कार्बनचं आहे. तापमान वाढल्यावर तिथले सूक्ष्मजीव सक्रिय होतील. सेंद्रिय अवशेषांचं वेगाने विघटन करायला सुरुवात करतील आणि सोबत रोगराईही फैलावतील. करोनाची महासाथ आपण नुकतीच अनुभवली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाने आज स्थिर असणाऱ्या परिसंस्था (इकोसिस्टम्स) ढासळतील. परिणामी आणखी महासाथी येऊ शकतील, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. पर्माफ्रॉस्टमधून मोकळे झालेले सूक्ष्मजीव हा धोका वाढण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
इतकं भीतिदायक चित्र रंगवताना त्यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी काही मार्ग सुचवला आहे का? खरं तर अमेझॉन जंगल बेचिराख होणे, प्रवाळ पूर्णपणे नष्ट होणे, पर्माफ्रॉस्ट संपून जाणे अशा घटनांना क्लायमेटटिपिंग पॉइंट अशी संज्ञा आहे. हे टिपिंग पॉइंट ओलांडले की त्यानंतर आपण पृथ्वीवर कोणत्याही प्रकारे पुन्हा मूळ स्थिती परत आणू शकणार नाही. तेव्हा आधीच काही हालचाल करायला हवी. ती कशी, कोणी करायची हे लवकरात लवकर ठरवणं आवश्यक आहे.