मुंबई : कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी पोलिसांना घटनेच्या दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना दिले आहेत. या प्रकरणात जखमी धीरज देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेत खडकपाडा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. आता न्यायालयातील सुनावणीत काय आदेश देणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी 20 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. 18 डिसेंबरच्या रात्री कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील अमजेरा हाईट या उच्चभ्रू सोसायटीत धूप जाळण्याच्या कारणावरुन माेठा वाद झाला होता. या वादात मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी बाहेरुन काही लोकांना बोलावून शेजारी राहणारे अभिजीत देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह काही जणांना मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यावर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता यांच्यासह अन्य पाच जणांना अटक केली होती. अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात पर्यटन विभागात कार्यरत असल्याने तो गाडीवर दिवा फिरत होता असे आरोप झाले होते. घटनेनंतर अखिलेश शुक्ला याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात पीडित कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी धीरज देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकाकर्ता यांची बाजू ऐकून घेतली. याचिकाकर्ते देशमुख यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. गुन्ह्यातील मारेकऱ्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत जखमीचा पाठलाग केला. या प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांचा सीडीआर चेक करण्यात यावा. या प्रकरणातील अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. सर्व आरोपीविरोधात मकोका अंतर्गंत कारवाई करण्यात यावी या प्रकरणात उच्च न्यायालयाने घटनेच्या दिवशी 18 आणि 19 डिसेंबरचा सीसीटीव्ही जतन करुन ठेवावा असे आदेश कल्याण पोलिसांना दिले आहेत अशी माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे.