नवी दिल्ली : देशात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एक समाधानकारक बातमी समोर येत आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. याचाच अर्थ रुग्ण कोरोनातून बरे होत असल्याचे प्रमाणही वाढले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे समोर आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात १३५०० च्या घरात गेलेली शुक्रवारी सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देशात १७४८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची टक्केवारी १३ इतकी आहे.
गेल्या शनिवारी देशात ७४४७ कोरोना विषाणूबाधित रुग्ण होते. त्यावेळी ६४२ रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. ही टक्केवारी त्यावेळी अवघी ८ इतकी होती. ती या आठवड्यात १३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. सर्वाधिक बरे होणारे रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. अर्थात एक लक्षात घेतले पाहिजे की देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आहेत.