Satara ZP: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्टपणे नाकारत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला कौल दिला असतानाही ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून सत्ता खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या बुध गटाच्या सदस्या लता अविनाश कर्णे यांनी पक्षनिष्ठा बदलून भाजपशी हातमिळवणी केल्याची आणि यामागे तब्बल १० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय, भाजपशी हातमिळवणी बुध जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला आरक्षण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने लता अविनाश कर्णे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन त्यांना एकतर्फी विजय मिळवून दिला. मतदारांनीही भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले. मात्र विजयानंतर लता कर्णे यांनी पक्षनिष्ठा बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आणि १० कोटींचा व्यवहार – भाजपच्या एका नेत्याने ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी बुध गटातील एका ‘सुपारीबहाद्दरा’कडे सोपवली. लता कर्णे यांना आधी राष्ट्रवादीने सावधगिरी म्हणून दोन आठवडे कॅम्पमध्ये ठेवले होते. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी गावी गेल्यानंतर त्या पुन्हा उटीच्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्या. मात्र ७ तारखेला साताऱ्यात झालेल्या एका बैठकीत १० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. यापैकी ५ कोटी अविनाश कर्णे यांना, तर उर्वरित ५ कोटी ‘सुपारीबहाद्दरां’नी घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर १० तारखेला लता कर्णे यांनी उटीतूनच भाजपशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे. सत्तास्थापनेवर परिणाम नाही – या सर्व घडामोडींनंतरही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या सत्तास्थापनेवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्या राष्ट्रवादीचे १९, शिवसेनेचे १५, काँग्रेस व स्वाभिमानी प्रत्येकी १ असे एकूण ३६ सदस्य आघाडीसोबत कायम आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत आघाडीची सत्तास्थापना निश्चित असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी – बुध गटातील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लता कर्णे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. त्यामुळे पक्षनिष्ठा बदलल्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षाशी गद्दारी केल्यास सदस्यत्वावर गदा येऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. साताऱ्यात नोटा नव्हे, जनतेचा कौल चालतो – सातारा जिल्ह्याचे राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शांवर आणि यशवंतराव चव्हाणांच्या लोकाभिमुख राजकारणाच्या परंपरेवर उभे आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपला बाजूला ठेवले. माण तालुक्यातही राष्ट्रवादीने स्पष्ट विजय मिळवला. असे असताना “मी म्हणेन तेच घडले पाहिजे” या अट्टाहासापोटी सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना यश मिळणार नाही. जनता शांत असली तरी भोळी नाही, ती योग्य वेळी मतपेटीतूनच उत्तर देते, हे विसरता कामा नये, अशा भावना व्यक्त होत आहेत.