satara : राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार

कराड तालुक्यातील घटना ; तिघांवर गुन्हा दाखल
कराड – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार का, या विषयावर चर्चा सुरू असताना रागाच्या भरात युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला. विजयनगर, ता. कराड येथे ही घटना घडली. युवकावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर तसेच हातावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रोहन हनुमंत ताटे (वय 31, रा. मुंढे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सागर तानाजी चव्हाण (रा. विजयनगर) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील रोहन ताटे हा युवक 29 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील एमएसईबी चौकात बुर्जीपाव खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याठिकाणी सागर चव्हाण आपल्या दोन मित्रांसोबत भुर्जीपाव खाण्यासाठी आला होता. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले असून आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लाभेल, असे म्हणत सागर याने राजकीय चर्चा सुरू केली.
त्यावेळी सागर आणि रोहन याच्यात शाब्दीक चकमक झाली. सागर शिवीगाळ करीत असताना रोहनने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा राग मनात धरून तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत सागर याने त्याच्याजवळील कोयत्याने रोहनच्या डोक्यावर, पाठीवर तसेच हातावर कोयत्याने वार केला.
तसेच सागरसोबत आलेल्या दोघांनीही रोहणला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर जखमी रोहन याला त्याच्या नातेवाईकांनी कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.





