सातारा – केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचा महत्वाकांशी प्रकल्प सध्या राज्यात सुरु आहे. देशातील जवळपास 63 हजार विकास सेवा संस्था एक सॉफ्टवेअर प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत. त्यात राज्यातील जवळपास 12 हजार संस्था जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे विकास सेवा संस्थाच्या कामकाजामध्ये एकसूत्रता राहणार असून, शेतकऱ्यांना जलद, अचूक व पारदर्शक सेवा मिळणार आहे, असा विश्वास नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यामध्ये 960 पैकी 933 संस्थाचे संगणकीकरण मार्च 2024 पर्यंत करण्याचे उद्धिष्ट आहे. जिल्ह्यातील विकास सेवा संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून मार्च 2023 अखेरचे ऑडीट पूर्ण झालेले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जवळपास 97 टक्के संस्थाचे संगणकीकरण प्रथम टप्प्यात घेण्याचे निश्चित झाले अ ाहे.
हा बहुमान एकमेव सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला व संलग्न सोसायट्यांना मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा, वाई, जावली व कराड या चार तालुक्यातील 214 विकास सेवा संस्थाचे सभासद, कर्जे, धारण क्षेत्र इत्यादी अनुषंगिक माहिती संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्याचे कामकाज सुरु आहे. त्याची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी श्री. रावत व नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक सुधाकर रघुतवान तसेच नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी यांनी चार तालुक्यातील क्लस्टर्सना सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. खंडाळा क्लस्टरच्या भेटीप्रसंगी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक दत्तानाना ढमाळ यांनी स्वागत केले. श्री. रावत यांनी प्रकल्पाच्या प्रगतीपर कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी बॅंकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, राजीव गाढवे, उपव्यवस्थापक श्री. भंडारे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जे. पी. शिंदे व सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा महत्वाकांशी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव व संबधित सर्व अधिकाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, सर्व संचालक सदस्य, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी आदींनी केले आहे.