प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा पालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा स्थानिकांच्या विचारांना लक्षात घेऊन सर्वमान्य असे नेतृत्व निवडले जाईल, तसेच नगरसेवकपदांची यादी सुद्धा सर्वमान्यतेने पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेनंतर अंतिम केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.येथील सुरुची निवास येथे शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मनोमिलनामध्ये अंतिम 50 उमेदवार आणि नगराध्यक्ष याबाबत कोणाची नावे निश्चित झाली याविषयी साताऱ्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भाजपने घेतलेल्या मुलाखतींचा सर्व अहवाल स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रदेश कार्यकारणीला मुंबई येथे झालेल्या बैठकीत सादर केलेला आहे.त्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ते म्हणाले, सातारा पालिकेची निवडणूक भाजपचा उमेदवार म्हणून कमळ चिन्हावरच लढली जाणार आहे. यामध्ये हा या गटाचा उमेदवार तो त्या गटाचा उमेदवार असा कोणताही फरक केला जाणार नाही. सातारा जिल्ह्यातच निवडी रखडून पडल्या आहेत आणि सर्व नगरपालिका निवडणुकांचा उमेदवार निश्चितीचा कार्यक्रम अंतिम झाला आहे असे बिलकुल नाही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सुट्टीचा दिवस बघून तीन दिवस बाकी आहेत. पक्षश्रेष्ठींनी याबाबत आम्हाला मोकळीक दिली असून स्थानिक पातळीवरची परिस्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे समन्वयाने चर्चा करूनच पक्षश्रेष्ठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या नावाचे प्रस्ताव अंतिम करणार आहेत. सातारा शहराच्या प्रश्नांची जाण असणारा नगराध्यक्ष सुद्धा स्थानिकांच्या विचारांना लक्षात घेऊनच अंतिम केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी तिकीट मिळाले नाही म्हणून भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करायचे नाही अशी भूमिका घेऊ नये उलट भाजप उमेदवाराला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीने साताऱ्यासाठी काय केले महाविकास आघाडीने साताऱ्यात महायुतीला दिलेल्या आव्हानाबद्दल बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडीचे राज्यात सरकार होते. साधी साताऱ्याची हद्दवाढ यांना करता आली नाही. महाविकास आघाडीने साताऱ्यासाठी काय केले असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे त्यांचे आव्हान किती मानायचे त्यांच्याकडे लढायला उमेदवार किती आहेत हेही आपल्यासमोर आहे. त्यांना या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जर पराभवाचे तोंड पहावयाचे असेल तर आमच्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत .