प्रभात वृत्तसेवा सातारा – तारळी धरणाशी संबंधित अदानी प्रकल्पाच्या विरोधात शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संपूर्ण तारळे खोऱ्यातील जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन अदानी प्रकल्प विरोधी कृती समितीचे बाळासाहेब सपकाळ यांनी केले आहे.या दिवशी तारळी धरण (तोंडोशी- दक्षिण बाजू) येथे धरणालगतच्या मैदानात सर्व नागरिकांनी एकत्र जमायचे असून, प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनानंतर तेथून पायी मोर्चा प्रकल्प स्थळाकडे काढण्यात येणार आहे. हे आंदोलन कामबंद स्वरूपाचे असणार आहे.या आंदोलनासाठी जांभे, चोरगेवाडी, विजयनगर, जिमनवाडी, बागलेवाडी, भोकरवाडी, केंजळवाडी, डफळवाडी, कळंबे, जळव आदी पठार विभागातील गावे, मुरुड विभागातील सर्व गावे, तसेच तारळी नदीच्या दोन्ही काठावरील लाभक्षेत्रातील गावे, पुनर्वसित धरणग्रस्त गावे आणि कराड, सातारा, माण, खटाव तालुक्यातील तारळी लाभक्षेत्रातील गावे अशा साधारण १४० गावांतील नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावातील प्रमुख व्यक्तींशी कृती समितीच्या वतीने संपर्क साधण्यात येत असून, नागरिक, माता-भगिनी यांनी मोठ्या व प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भविष्यासाठी, स्थानिक गावांच्या अस्तित्वासाठी आणि तारळी धरण वाचवण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास बाळासाहेब सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.