Satara News – शहरात अनधिकृत रिक्षा थांब्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय यात मोठी वाढ होत आहे. शहरातील प्रमुख चौक, रुग्णालय परिसर, शाळा- कॉलेजजवळ आणि बाजारपेठांमध्ये रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने थांबे निर्माण केले आहेत. अधिकृत परवानगी नसतानाही हे थांबे सर्रास सुरु असून प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव स्पष्ट दिसतो. वाहतूक विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, सातारा शहरात सध्या सुमारे १८ ते २० अधिकृत रिक्षा थांबे असताना अनधिकृत थांब्यांची संख्या २० ते ४० च्या घरात गेली आहे. म्हणजेच अधिकृत थांब्यांच्या जवळपास चारपट बेकायदेशीर थांबे शहरात कार्यरत आहेत. याठिकाणी रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा वेग कमी होतो आणि अपघातांची शक्यता वाढते.विशेषतः पोवई नाका, शाहूपुरी, राधिका रस्ता, मोती चौक, करंजे परिसर येथे परिस्थिती अधिक बिकट आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत आणि कार्यालयीन गर्दीत या अनधिकृत थांब्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग केवळ नोटिसांपुरता मर्यादित असल्याचे दिसते. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत वाहतूक पोलिसांनी ३०० हून अधिक रिक्षांवर कारवाई केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. कारवाईनंतर काही दिवस शिस्त दिसते. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी रिक्षा उभ्या राहतात. यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अनधिकृत थांब्यांमुळे ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होते. रस्त्यावर अडथळे निर्माण होतात आणि व्यवसायावर परिणाम होतो, असे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांचे म्हणणे आहे. तर काही रिक्षाचालकांनीही अधिकृत थांबे अपुरे असल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून अनधिकृत थांबे हटवणे, अधिकृत थांब्यांची संख्या वाढवणे आणि कडक दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा साताऱ्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.