वाई (प्रतिनिधी) – देशासह राज्यात लॉकडाऊनच्या काळात शहरांसह ग्रामीण भागामधील सर्व व्यवहार ठप्प असतानाही लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा म्हणून बळीराजाचे उत्पादित दूध राज्याच्या शहराशहरांत पोच झाले तरीही आजतागायत दुधाचे दर वाढले नसल्याने दुधाबरोबरच दूधापासून उत्पादित पदार्थांचे दर लॉकडाऊनच्या काळातही शहरी भागात नेहमीसारखेच तेजीत राहिले. परंतु, ग्रामीण भागात दुधाचे दर मंदीत राहिल्याने कष्टकरी दूध उत्पादक बळीराजा दरापासून आजही वंचित राहिला आहे.
करोनाच्या संकटात सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेला असताना बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ किंमती वाढवून व्यापाऱ्यानी ग्राहकांची आर्थिक लूटमार केली. लॉकडाऊनचे कारण पुढे करत मालाचा तुटवडा सांगत मनाप्रमाणे ग्राहक वर्गाची हातसफाई केली. नागरिकांनीही लॉकडाऊनच्या भीतीने गरज समजून प्रत्येक वस्तूला जास्तीचे पैसे मोजले. बिस्किटच्या पुड्यापासून साखर, तेल, मिरची, वेगवेगळ्या डाळी, काडीपेटीपासून पनीर, दही, तूप, श्रीखंड, आम्रखंडापर्यंतचा सर्व माल विनातक्रार गपगुमान खरेदी केला.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता कारखानादारीपासून ते छोटेमोठे सर्व व्यवहार ठप्प असताना नागरिकांच्या सेवेसाठी शेतकऱ्याच्या शेतातील वांगी, कोबी, भेंडी, गवारी, मिरची, कांदे, बटाटे, लसूण या याबरोबरच रोज सकाळी लागणारे दुधासारखे उत्पादन सुरू होते. दुकानातील अन्य वस्तू चढ्या भावाने विकल्या जात असताना शेतकऱ्यांच्या एकाही मालाला योग्य भाव मिळाला नाही. अत्यावश्यक दुधाचीही गोष्ट त्याहून निराळी नाही.
ग्रामीण भागात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यातूनच अनेक कुटुंबांचा दैनंदिन प्रापंचिक खर्च भागवला जातो. त्याच दुधापासून तयार होणाऱ्या दुग्धजन्य मालाला बाजारात चार ते पाचपट अधिकचा भाव मिळतो.
परंतु, दुधाला मात्र पिढ्यापिढ्या ठराविकच भाव दिला जात असल्याने दूध उत्पादन चांगल्या दरापासून कायम वंचित राहिले आहे, याकडे कोणाचे लक्ष नाही. चाऱ्याचा तुटवडा, जनावरांच्या वाढत्या किंमती, पशुखाद्याच्या वाढलेल्या दराने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशाही परिस्थितीत कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी दूध उत्पादक दुधाचे उत्पादन घेत आहे.
कष्टकरी उपाशी, बाकीचे तुपाशी!
अनेक अडचणींचा सामना करूनही दूध उत्पादक बळीराजाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला दर मिळत नाही. मात्र दुधापासून उत्पादित केलेल्या मालाला दुधापेक्षा चार ते पाचपट भाव मिळत आहे. आजही ग्रामीण भागात गायीच्या दुधाला 18 ते 20 रुपये तर म्हशीच्या दुधाला 25 ते 30 रुपये इतका अत्यल्प दर दिला जात आहे. त्याच दुधाची शहरी बाजारपेठेत मात्र 60 ते 70 रुपये दराने विक्री होत आहे
तर दुधापासून वेगवेगळ्या ब्रॅंडच्या नावाने निर्मिती झालेले दही, आम्रखंड, श्रीखंड,तूप, बासुंदी व अन्य पदार्थांना दुधाच्या चार ते पाचपट किंमत मोजावी लागत आहे. दुधापासून बनवलेल्या दूध पावडरलाही चांगला दर प्राप्त होतोय.
परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चिरीमिरीत भागवले जात आहे, याचे कोणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे कष्ट करूनही “कष्टकरी कायमच उपाशी, बाकी सगळे तुपाशी’ ही परिस्थिती बदलण्याची भावनिक साद बळीराजाकडून घातली जात आहे.