Satara News : कोयना धरणग्रस्तांना विशेष शिबिरात जमिनी दाखविणार; मंत्री शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांचा दीर्घकाळचा संघर्ष अखेर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धरणग्रस्तांना दिलासा देणारी घोषणा केली. “जमीन मिळणारच! ज्यांनी अजून अर्ज केलेले नाहीत त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत. शासनाच्या नियमानुसार दोन एकर जमीन व ३७० चौ. फुटांचा भूखंड हमखास देण्यात येईल,” असे ते म्हणाले.
या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते. धरणग्रस्तांनी पसंतीची जमीन प्रशासनाला तातडीने कळवावी. मूळ मालक हयात नसल्यास त्यांच्या वारसांना अर्ज करता येईल. आवश्यक कागदपत्रे नसलेल्यांना प्रशासनाकडून मदत केली जाणार आहे.
प्रकल्पग्रस्तांचे दाखले सहज मिळावेत यासाठी शासनाने नियम शिथिल केले असून त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महसूल प्रशासनाला विशेष शिबिरांचे आयोजन करून पसंतीच्या जमिनी दाखविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.महिंद प्रकल्पग्रस्तांच्याही मागण्यांवर चर्चा झाली. बोर्गेवाडीचे पुनर्वसन चौगुलेवाडी व सांगवड येथे करण्यात आले असून, त्या ठिकाणी मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. गणेशोत्सवानंतर जमिनी दाखविण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, उदरनिर्वाह भत्त्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.





