पाटण : (अरुण पवार) – सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी येथील नेते जरा जास्तच उतावीळ झाल्याचे दिसू लागले आहे. पाटणचे कट्टर राजकीय विरोधक शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांची पळापळ वाढली आहे. मंत्री देसाई यांनी आता पाटण तालुक्यात तळ ठोकला असून दुसरीकडे सत्यजित पाटणकर हे देखील जास्त संवेदनशील दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यात संवाद मेळावे व भूमिपूजने उदघाटनांचा सपाटा सुरू असून पाटण पंचायत समितीची सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार हे येणारा काळच सांगणार आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपेक्षा यावेळची पाटण तालुक्यातील निवडणूक राजकीय दृष्ट्या जीवघेणी वाटू लागली आहे. कारण राज्याचे पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्रिपद मिळाल्याने बलाढ्य झालेल्या शंभूराज देसाई यांना कसल्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने पाटण पंचायत समितीची सत्ता ताब्यात घ्यायची आहे. तर अपयशांची मालिका तोडून मंत्री शंभूराज देसाई यांना पहिला जोरदार धक्का द्यायचा असेल तर पाटण पंचायत समितीची सत्ता घेतल्याशिवाय सत्यजित पाटणकर व त्यांच्या गटाला पर्याय नाही. भाजपसारखा सत्ताधारी मोठा पक्ष मिळाल्यामुळे पाटणकर गटाने किंवा त्यांच्या नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावायचे ठरवले आहे. त्यासाठी रात्रीचा दिवस करून छोटे-मोठे कार्यक्रम आणि सुखदुःखाचे प्रसंग हे न चुकवता सत्यजित – याज्ञसेन हे दोघे बंधू फुल अँड फायनल या जिद्दीने उतरले आहेत. नुकसान झालेल्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसातून पाटणकर गटाला नवी ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा परिषद व पाटण पंचायत समिती काठावर नाही तर मोठ्या फरकाने मिळालीच पाहिजे. हा मंत्री शंभूराज देसाई यांचा मानस आहे. आणि या खेपेस जर असे झाले तर पाटणकर गटाला उभारी घेणे कठीणच होईल. त्यासाठी शंभूराज देसाई यांनी आचारसंहिता लागण्याअगोदरच रविराज व यशराज यांच्या सहकार्यातून तालुका पिंजून काढायला सुरुवात केली आहे. स्वतः शंभूराज देसाई हे देखील आता रोज पाटण तालुक्यात आहेत. तयारी करा कामाला लागा, उमेदवारांना निरोप पाटण तालुक्यात जिल्हा परिषदेपेक्षा पाटण पंचायत समिती निवडणुकीला दोन्ही गटाकडून अधिक महत्व दिले जाते. पाटण पंचायत समितीच्या उमेदवारांची अंतिम यादी दोन्ही गटांच्या नेत्यांच्या डोक्यात फिट असल्याचे समजते. त्यामुळे काहींना तुम्ही तयारीला लागा असे गुप्त मेसेज गेल्याची चर्चा आहे. हेळवाक, येराड, म्हावशी, चाफळ, तारळे, मुरुड, नाटोशी, मारूल हवेली, कुंभारगाव काळगाव, मुंद्रूळ कोळे, सणबुर मल्हार पेठ, नवा रस्ता असे चौदा गण आहेत.