प्रभात वृत्तसेवा सातारा – शाहूनगर, सदर बझार, गोडोली येथील अपुर्या आणि कमी दाबाने पाणी येण्याच्या समस्येवर पालिकेत तक्रारीचा पाढा वाचला गेला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांना फक्त बिल पाहिजे, आपण काही काम करत नाही, अशा परखड तक्रारी नगरसेवकांनी करत प्राधिकरणाच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. नगरसेवक फिरोज पठाण यांनी बैठकीतच प्राधिकरणाच्या पाण्याचा जार आणून टेबलावर ठेवल्याने अधिकार्यांची बोलतीच बंद झाली. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी यंत्रणेला परखड बोल सुनावले.शहरालगतच्या उपनगरांमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाण्याची प्रचंड ओरड आहे. शाहूनगर, गोडोली, सदर बझार, जगतापवाडी, तसेच गोळीबार मैदान परिसरातील तब्बल 19 सोसायट्यांना पाणी नाही. या अपुर्या पाणीपुरवठ्याचे आणि पाणी वितरणाच्या गोंधळाचे तीव्र पडसाद सातारा पालिकेने बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत उमटले. नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण, सुशांत महाजन, हेमलता भोसले, निशांत पाटील, अक्षय जाधव, विश्वतेज बालुगडे इत्यादी नगरसेवक उपस्थित होते. प्राधिकरणाचे पाणी पिण्या योग्य नाही, माहुली येथील उपसा केंद्रामध्ये पाणी व्यवस्थित स्वच्छ होत नाही, प्राधिकरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत, अशा तक्रारी फिरोज पठाण यांनी केल्या. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी गोडोली परिसरातील रस्ते 2023-24 ला करूनही पाईपलाईन कामासाठी फोडण्यात आली. त्याची कल्पनासुद्धा पालिकेला देण्यात आली नाही, अशी तक्रार त्यांनी केली.बैठकीमध्ये पालिका व्यवस्थापन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. फिरोज पठाण यांनी प्राधिकरणाच्या गढूळ पाण्याचा भरलेला जार बैठकीत आणून टेबलावर ठेवल्याने प्राधिकरणाच्या यंत्रणेची बोलतीच बंद झाली. थातूरमातूर कारणे देऊन या बैठकीमध्ये अधिकार्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुशांत महाजन व हेमलता भोसले यांनी संबंधित यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. अजिंठा चौकामध्ये सुद्धा गटाराचे पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी बैठकीत येऊन स्वयंस्फूर्तीने सांगितल्या. प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजित वाघमारे यांची दांडी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर ताशेरे उमटणार, याची कल्पना आल्यानेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजित वाघमारे यांनी बैठकीला दांडी मारली. बैठकीला येण्यासाठी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी वाघमारे यांना फोन केला असता आपण बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. शाखा अभियंता व उपाभियंता यांना बैठकीमध्ये उत्तरे देण्याची वेळ आली. भैरोबा टाकीच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईनला स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले नाही, अशी तक्रार अविनाश कदम यांनी केली. प्राधिकरण यंत्रणेशी त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्व झालेल्या पाणीपुरवठा वितरण बैठकीत पहिल्याच दिवशी झालेली बैठक अत्यंत वादळी झाली.