Satara News – सातारा शहरातील पर्यायी आणि महत्त्वाचा समजला जाणारा राधिका रोड आज अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून “कार्पोरेट रोड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राधिका चौक ते बारटक्के कॉर्नर आणि तेथून महाराणा प्रताप चौकापर्यंत फर्निचर व्यावसायिकांचे वाढते अतिक्रमण, फळ विक्रेत्यांच्या पथाऱ्या, बंद टपऱ्यांचा सुळसुळाट, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या “फॉर सेल” गाड्या आणि अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. बसाप्पा पेठ परिसरातील मोकळ्या जागा आता “रिसेल ऑटो इंडस्ट्री”च्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. एखादे छोटे शटर भाड्याने घेऊन दुकानासमोर दहा-दहा गाड्या उभ्या करून खुले वाहन बाजारच सुरू करण्यात आले आहेत. या गाड्यांभोवती होणारी गर्दी, रस्त्याच्या कडेला उभे राहणारे ग्राहक आणि मध्यभागी उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः बारटक्के चौक ते सेनोर चौक दरम्यान उभे असलेले ट्रक, बंद टपऱ्या आणि धोकादायक वळणांवरील अतिक्रमणे नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची घोषणा केली होती. सातारा नगरपालिकेने डीपीआर तयार केल्याचाही दावा केला; मात्र प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही. परिणामी रस्ते विकासाऐवजी अतिक्रमणांच्या ताब्यात जात असल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. सातारा नगरपालिका. दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी “टपरीमुक्त सातारा” आणि “हॉकर्स झोन”ची घोषणा केली होती. फेरीवाला समितीच्या बायोमेट्रिक यादीतील विक्रेत्यांना नियोजित जागा देण्याचे आश्वासनही देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कोणताही हॉकर्स झोन विकसित झालेला नाही. त्यामुळे अतिक्रमणमुक्त साताऱ्याचे स्वप्न केवळ कागदावरच राहण्याची शक्यता वाढली आहे. बारटक्के चौक बनला ‘मिनी ट्रक टर्मिनस’ राधिका रोडवरील बारटक्के चौक परिसरात रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची उभी राहणारी रांग आता गंभीर सुरक्षेचा प्रश्न ठरू लागली आहे. ट्रक, मालवाहू वाहनं आणि कंटेनर रस्त्यालगत बेकायदा उभे राहत असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परिसर धोकादायक बनला आहे. वाहतूक पोलिस आणि नगरपालिकेकडून कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “तळीराम अड्डे” आणि बंद टपऱ्यांनी विद्रूपीकरण प्रस्तावित प्रांत कार्यालयासमोरील बंद टपऱ्या, गंमत-जंमत व सिटी वाईन शॉप परिसरातील खुले मद्यप्राशन आणि गाड्यांवरच रंगणाऱ्या मैफिलींमुळे राधिका रोडची प्रतिमा मलिन होत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला हा प्रकार महिलांसाठी व नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रशासनाने केवळ नोटिसा न देता थेट जप्ती आणि कायमस्वरूपी हटाव मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.