कोयनानगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने जलविद्युत प्रकल्पामधून वीजनिर्मिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जलविद्युत निर्मितीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवालात पश्चिम महाराष्ट्रातून 20 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. यातील 880 मेगावॅट वीजनिर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्यामधून करण्याचे निश्चित आहे. त्याचबरोबर गेल्या 8 वर्षांपासून बंद पडलेला कोयना धरणाच्या डाव्या तीरावरील 80 मेगावॅट क्षमतेचा पायथा वीजगृह या बहुउद्देशीय प्रकल्पाला ऊर्जितावस्था देण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती कोयना प्रकल्पाचे विद्युत व गुणनियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता संतोष तिर्मिर्नवार व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी दिली.
– बहूचर्चित सहाव्या टप्प्याचा मार्ग सुकर
– पायथा वीज गृहाचा प्रश्न निकाली निघणार
– कोयनेतून 880 मेगावॅट वीजनिर्मिती होणार
राज्य सरकारने पानशेत धरण, माळशेज घाट, लोणावळा येथील आठवण, नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत ,मुळशी तालुक्यातील वरसगांव धरणावर, रायगड जिल्ह्यातील उंबार्डे येथील काळ नदीबरोबर, तसेच कोयना प्रकल्पातील दोन ठिकाणी जलविद्युत निर्मितीच्या माध्यमातून सहयाद्री पर्वतरांगांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी किलोवॅट वीस हजार मेगावॅट विजनिर्मिती होऊ शकते. अशा सर्वेक्षणाचा अहवाल जलसंपदा विभागाने सादर केला असून त्यावर धोरण ठरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
हे काम दोन ते तीन टप्प्यात करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्रकल्पाचे मुख्य अभियंता संतोष तिर्मिनवार व एच.व्ही गुणाले यांनी स्पष्ट केले.
राज्यासाठी बहुउद्देशीय असणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील जनतेला तिमिराकडून तेजाकडे नेणारा कोयना या तेजोमय प्रकल्पाला स्थान मिळाले आहे. कोयना धरणाच्या वरच्या बाजूला बाजे- कारवटजवळ दुसरे धरण बांधून खालच्या धरणातील पाणी वरच्या धरणात उचलण्यात येणार असुन त्यासाठी अआधुनिक व नवीन असणारे रिव्हर्सबल टर्बाइन हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यातील मोटर पाण्याने सरळ फिरल्यास वीजनिर्मिती होईल.आणि उलटी फिरल्यास पाणी वर उचलले जाईल. जापानीज पद्धतीने वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुबंई (कळवा) येथील महानिर्मितीच्या भारनियमन केंद्रातून विजेची मागणी व तात्काळ पुरवठा कऱण्यासाठी वरच्या धरणातून खालच्या धरणात पाणी सोडून वीजनिर्मिती केली जाईल. कोयना धरणाजवळ डाव्या तीरावर 80 मेगावँटच्या प्रकल्पाला शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे हे काम बंद आहे. या कामाची दरसूची बदलली आहे. या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी नवीन दरसूचीप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याने या प्रकल्पाला याच वर्षांत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळून नवीन वर्षात हे काम सूरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.