Satara : अधिवेशनामध्ये कायदा करा अन्यथा जनतेचा उद्रेक

सातारा : राज्य शासनाचे सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनामध्ये वादग्रस्त वक्तव्याबाबत आरोप प्रत्यारोपाचा गदारोळ सुरू आहे. मात्र, महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांसंदर्भात कठोर कारवाई करणारे विधेयक राज्य शासन आणि विरोधकांनी एकमतीने संमत करावे. अन्यथा त्यांना जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. जे प्रतिनिधी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात त्यांनी हा कायदा संमत केला नाही तर त्यांचे शिवप्रेम बेगडी आहे. त्यांना युगपुरुषांचा नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधींना फटकारले.
खासदार उदयनराजे भोसले येथील जलमंदिर या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महापुरुषांच्या वक्तव्यासंदर्भात राज्य शासनाने तत्काळ कायदा करावा याविषयी रोखठोक विचार व्यक्त केले. उदयनराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी लोककल्याणाचा आणि लोकसहभाग असणाऱ्या स्वराज्याचा विचार मांडला होता. त्यामुळेच आजच्या लोकशाहीमध्ये आपण मुक्तपणे संचार करत आहोत. मात्र, आज काल कोणीही उठते आणि महापुरुषांच्या नावाने सवंग प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करत आहे. अशा प्रवृत्ती निंदनीय आहेत.
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमताने यंदाच्या अधिवेशनामध्येच महापुरुषांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांना प्रतिबंध करणारा कायदा संमत करावा व आपले शिवप्रेम खरे आहे हे जनतेला दाखवून द्यावे. अन्यथा लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांचे प्रेम बेगडी आहे असे आम्ही समजू.’’ हा कायदा त्यांनी केला नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधी माफ करणार नाही. राज्य शासनाला एका मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
उदयनराजे म्हणाले, ” यासंदर्भातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत या खटल्याचा तपास उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी करेल. हा कायदा अजामीन पात्र तसेच दहा वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त आर्थिक दंड करणारा असेल. जे लोकप्रतिनिधी असे महापुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतील त्यांना तात्काळ अपात्र केले जावे, अशी कठोर कलमे त्या कायद्यात असावी.
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली स्वैराचार नको
राज्य शासनाने छत्रपती शिवरायांसह राजघराण्यातील इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे अधिकृत ऐतिहासिक सत्य माहिती सांगणारे शासकीय खंड प्रकाशित करावे. जेणेकरून विकृत इतिहास मांडला जाणार नाही. तसेच पीरियॉडिक ड्रामा अथवा ऐतिहासिक चित्रपट तयार करणाऱ्या दिग्दर्शकांना काल्पनिक पुस्तकांचा आधार घ्यावा लागणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासात स्वैराचार होतो. त्यामुळे इतिहास तज्ज्ञांशी चर्चा आणि संशोधनानंतरच बंदिस्त पटकथा लिहिली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
विकृत लोकांची नसबंदी झाली पाहिजे
महापुरुषांवर टीका करणारे व्यक्ती एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत, त्याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘वादग्रस्त वक्तव्य करणारे हे सवंग प्रसिध्दीसाठी असे वक्तव्य करतात. हे कोणत्या धर्माचे, पक्षाचे किंवा जातीचे नसतात. ते विकृत असतात. अशा विकृत लोकांची नसबंदी झाली पाहिजे. म्हणजे अशी वाचाळ पिढी पुढे जन्माला येणार नाही.





