Satara Congress – देशावर सुमारे ६० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्या काँग्रेस पक्षाची पंधरा वर्षात मोठी पिछेहाट झाली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याचे अनेक बुरुज निसटून गेल्याने जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली आहे. काँग्रेसने अनेक आघात झेलले, अनेक जण दुसर्या पक्षात गेले. गेल्या काही महिन्यांमध्ये तर जिल्हा काँग्रेसला मोठी गळती लागत दिग्गजांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसची वाताहात झाली. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही खासदार, आमदार नाही. जिल्हा परिषदेत फक्त एक सदस्य निवडून आला. काँग्रेसमधील मरगळ रोखण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांना यश आले नाही. अंतर्गत कुरघोड्यांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये ‘हम साथ साथ है’ चा फक्त नाराच राहिल्याने पदाधिकारी, कार्यकर्तेही ढेपाळल्याचे दिसत आहे. कै. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक वर्षे देशाची सत्ता ताब्यात ठेवली. जिल्ह्यात त्या काळात काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची मोठी फौज होती. कसलाही स्वार्थ न ठेवता पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम होत होते. मात्र, गेल्या काही वर्षात काँग्रेसला उतरती कळा आली. नरेंद्र मोदी यांच्या जादूने देशात उसळलेली भाजपची लाट काँग्रेस अडवू शकले नाही. परिणामी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाचे राजकारण होऊन अनेक जण काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेले. दिवसेंदिवस अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. देशपातळीवरुन ते गाव पातळीपर्यंत काँग्रेसची पिछेहाट झाली. पृथ्वीराज चव्हाण. राहुल गांधी यांनी आक्रमकपणे देशात विविध ठिकाणी दौरे काढून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाने देशात काँग्रेसचे संघटन सुरु झाले होते. लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यामुळे काँग्रेसची ताकत जिल्ह्यात वाढली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. या संकटातही जिल्हा काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा ताकद देण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसची दमदार वाटचाल सुरु होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाची देश, राज्य व जिल्हा स्तरावर मोठी हानी होत आहे. सत्तेपासून दूर असल्याने अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केली. लाेकसभा निवडणुकीत पक्षाने जिल्ह्यात चांगले काम केले. मात्र, तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत तर खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनाच पराभवाचा सामना करावा लागला. एके काळी काँग्रेसमध्ये पदासाठी जोरदार स्पर्धा असायची मात्र आता कोणी पदे घ्यायला तयार नाही एवढी विदारक परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. जिल्हाध्यक्ष देखमुख पक्षाला उभारी देतील. नाराजांना एकत्र करुन जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करतील असे वाटत होते मात्र तसे काही होताना दिसत नाही.