प्रभात वृत्तसेवा सासवड – शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार अभिजीत जगताप यांनी सासवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक धोरणासह आपली भूमिका स्पष्ट केली. “100 टक्के चांगलं सुशासन आणि प्रशासन पारदर्शकपणे राबवले जाईल. सर्व घटकांना सोबत घेऊन सासवडकरांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत, अशी ग्वाही जगताप यांनी सासवडकरांना दिली. सासवडचे भवितव्य बदलण्यासाठी विकासात्मक नियोजन असल्याचे व्हिजन सांगत जगताप म्हणाले की, सासवडमध्ये राहण्याचा आनंद द्विगुणित होईल अशा पद्धतीचे आधुनिक, सुव्यवस्थित आणि शाश्वत शहर उभारण्याचे नियोजन भविष्यात राबवले जाईल. शहरातील नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि गरजा प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी स्वतंत्र नागरी हितसंरक्षण समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती “राज्यकर्ता व प्रशासन यातील दुवा” आणि तिसरा डोळा म्हणून कार्यरत राहील. “सर्व पक्ष, सर्व समाजघटक आणि सर्वसामान्य सासवडकरांना सोबत घेऊन पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा संकल्प आहे, असे सांगत अभिजीत जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. नदी सुधारणा व पर्यावरण संवर्धन केंद्र, राज्य शासन तसेच उद्योग–व्यवसायिकांच्या CSR निधीतून सांडपाणी स्वच्छता प्रकल्प उभारला जाणार. नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ऑक्सिजन हब तयार केला जाईल. नदी प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन पर्यावरणीय आराखडा लागू केला जाईल. आरक्षित जागांचे तातडीने ऑडिट सासवडमधील सर्व आरक्षित भूखंडांचे तात्काळ ऑडिट करून त्यावरील प्रलंबित कामे आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. ताथेवाडी फाटा येथे अपघातग्रस्त स्थळासाठी उपाययोजना करणार असून सासवडमधील गंभीर अपघातग्रस्त ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताथेवाडी फाटा येथे विशेष सुधारणा उपाययोजना राबविण्यासाठी तातडीचा पाठपुरावा केला जाणार आहे. “सहा महिन्यांत या ठिकाणावर ठोस काम पूर्ण केले जाईल,” असे जगताप यांनी स्पष्ट केले. सासवडचे धार्मिक-आध्यात्मिक पर्यटन उभारणी सासवड ही धार्मिक व आध्यात्मिक वारसा असलेली नगरी आहे. जगताप यांनी सांगितले की, शहराच्या भक्तीशक्तीचा इतिहास सांगणारे “डिजिटल संकेतस्थळ” तयार केले जाईल. यासोबतच स्लाईड शो बनवून दर आठवड्याला प्रसारित केला जाईल. दरवर्षी सासवड शहर सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. शववाहिनीचे आधुनिकीकरण सासवड शहरातील शववाहिनीची दुरावस्था लक्षात घेता, तिला आधुनिक वैकुंठ रथ या स्वरूपात परावर्तित करून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. पालखी तळाचे नूतनीकरण करणार असून सासवडच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या पालखी तळाचा रूप बदलून ते आधुनिक सुविधांनी युक्त केंद्र बनवण्यासाठी विशेष पाठपुरावा केला जाईल.