नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं, असे मत व्यक्त केलं. त्यासोबतच त्यांनी हिंदू-मुस्लिम संबंधाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. नोएडा इथं झालेल्या ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते हजर होते. त्यावेळी त्यांनी फाळणीच्या वेळी भारताला जे भोगावं लागलं ते विसरता येणार नाही, असे म्हटले आहे.
नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना मोहन भागवत म्हणाले, आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवं. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं, असं त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या फाळणीसंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, “भारताने फाळणीच्या काळात जे सोसलं आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळं पूर्वीसारखं होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असं मानणारी ही विचारधारा नाही. मात्र इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचं, लढाईचं मूळ हेच होतं.”
भागवत पुढे म्हणाले, या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही.