Vasant More | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाची मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ईडीकडून अटक झाल्यानंतर तुरुंगातील दिवसांच्या अनुभवावर संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकांमधून राऊतांनी अनेक खुलासे केले आहेत. महायुतीतील काही नेत्यांनी या पुस्तकावरून संजय राऊत यांच्यावर टीका देखील केली. याचदरम्यान या पुस्तकावर पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पुस्तकाची प्रत मोरे यांनी देव्हाऱ्यात ठेवली असून या पुस्तकाचे पारायण करणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे. तसेच पुण्यातील इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून देखील या पुस्तकाचं पारायण करून घेणार असल्याचे त्यांनी माध्यामांशी बोलताना म्हंटले आहे. पुस्तक देव्हाऱ्यात ठेवण्यामागचे सांगितले कारण वसंत मोरे पुढे म्हणाले की, ‘या पुस्तक प्रकाशनापूर्वी माझी आणि संजय राऊत यांची भेट झाली होती. या भेटीमध्ये त्यांनी हे पुस्तक विरोधात राहून ज्यांना यशस्वी राजकारण करायचं आहे. त्यांच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार असल्याचं म्हटलं होतं. मी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून देखील काम केलं आहे. त्यामुळे माझं राजकारण हे विरोधी बाकावर बसूनच यशस्वी झालं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातील स्वर्ग हे पुस्तक मी घेऊन आलो असून ते घरातील माझ्या देव्हाऱ्यात ठेवलं आहे. राजकारण चांगले आहे परंतु ते करताना आव्हाने येत असतात. त्यामुळे चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती देवाऱ्यापासून केली पाहिजे. हे पुस्तक माझ्यासाठी विरोधी पक्षात राहून यशस्वी राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक ठरणार आहे,” असं मोरे म्हणाले. Vasant More | पुढे वसंत मोरे म्हणाले, “राऊत हे ज्या पद्धतीने विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी बिनधास्तपणे वावरत असतात. त्याच पद्धतीने पुण्यात देखील मी लोकांची कामे करताना कोणताही राजकीय विचार मनात न आणता बिनधास्तपणे वावरत असतो. त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. शिवाय आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संजय राऊतांनी लिहिलेल्या पुस्तकाचं मी पारायण सर्व शिवसैनिकांकडून करून घेणार आहे,” असं त्यांनी सांगितले आहे. Vasant More | “भाजपच्या लोकांनी खऱ्या अर्थाने हे पुस्तक वाचले पाहिजे” “शिवसैनिक म्हणून आम्ही हे वाचणारच आहोत पण याची वाचण्याची गरज भाजपाच्या लोकांना आहे. खऱ्या अर्थाने मोदी काहीच नव्हते त्यांना पाठिंबा कुणी दिला, विश्वगुरू होण्यामागे पायाभरणी कुणी केली, हे सर्व भाजपाच्या लोकांनी वाचायला पाहिजे,” असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. हेही वाचा: ‘ऑपरेशन सिंदूर’वर संघाचे नवे विधान ; सुनील आंबेकर म्हणाले, ‘देशावरील संकटाच्या वेळी…’