मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत केसीआर यांच्या कानात ‘नो क्वेशन अन्सर’ असे कुजबुजले. या प्रकाराची एक व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही हा व्हीडिओ शेअर करत संजय राऊत यांना प्रश्नांची खुप भीती वाटू लागली आहे, असे ट्विट करत टोला लगावला आहे.
घडले असे की, पत्रकार परिषदेत राव बोलायला सुरूवात करायच्या आधी राऊत यांनी लगबगीने त्यांना कानात सांगितले की, फक्त तुम्ही बोला, नो क्वेशन अन्सर, म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नका. त्यानंतर राव यांनीही होकारार्थी मान हालवली आणि बोलण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीही संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळीही राऊतांनी नो क्वेशन, अन्सर म्हंटले होते. त्यामुळे राऊतांना कसल्या प्रश्नांची भिती वाटतेय? असा सवाल विरोधक विचारत आहेत.
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील राजकारण गढूळ बनत आहे, आज नवी सुरुवात आम्ही केली आहे. तसेच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिले आहे.
राव म्हणाले की, आम्ही दोघे भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू. देशाच्या राजकारणाबाबत चर्चा तर होणारच होती. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे. देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. इतर पक्षाच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा देशात क्रांती घडवतो. एक चांगली सुरूवात आम्ही इथून करत आहोत, असे राव यांनी सांगितले.