मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. हिंदूंकडे हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे. तसेच हिंदूंची व्होट बँक देशात आहे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सिद्ध केलं, असे ते म्हणाले. तसेच आमचं हिंदुत्व हे केवळ मंदिरांपुरतं मर्यादित नाही, राजकारणापुरतं मर्यादित नाही, हे त्यापुढंच आहे, पलिकडचं आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
“चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली का हे माहिती नाही, मात्र त्यांनी या देशातील सर्वात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला,” असे संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट अशी उपाधी देशातील जनतेने दिली. ज्याप्रमाणे मराठी माणसाला मराठी म्हणून मत द्यायला लावलं, त्याप्रमाणे एक दिवस देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मत द्यायला लावीन असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याच प्रमोद महाजन म्हणाले होते. बाळासाहेबांनी १९९२ नंतर करुन दाखवले.
पार्ल्यातील पोटनिवडणुकीत शिवसेना प्रथम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली. तेव्हा हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी असा विचार तेव्हा कोणाच्याही मनात आला नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदारांचे निलंबनही झाले होते. रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एका आमदाराला हिंदू व्होट बँक म्हणून मतं मागितल्याने तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
“महाराष्ट्रात किंवा देशात भाजपाच्या एखाद्या आमदाराला, खासदाराला हिंदू व्होट बँक या मुद्दयावर निवडणूक गमावावी लागली असं वाटत नाही. आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार सर्वात प्रथम या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोणी कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. पण या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही,” असे यावेळी ते म्हणाले.
“अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय प्राप्त करतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमंच हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात ते आहेत,” असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “व्होट बँकेचं राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करु देत. पण इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर असलेली हा पानं कधीच कोणाला फाडता आणि पुसता येणार नाहीत.