कोल्हापूर: संजय राऊत हे इतके ग्रेट आहेत की परमेश्वराला देखील प्रश्न विचारतील म्हणून त्यांना उत्तर कोण देणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
भारत-चीन ताणावर संजय राऊत यांनी काही विधाने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी त्यांचा चिमटा काढल्याचे समजते.
पाटील म्हणाले, भाजपा मध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक बदल होत असतात. कोरोनाच्या संसर्गामुळे हे बदल करण्यात आले नव्हते मात्र कोणत्याही पद्धतीचा इव्हेंट न करता राज्याची नवी कार्यकारणी येत्या आठवड्यात घोषित केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच कोल्हापूर महानगरपालिका भाजपा आणि ताराराणी आघाडी एकत्र मिळून निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे