मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच हे केवळ फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचे सरकार नसून दोषींवर कारवाई होणार असे म्हणत कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राम कदम यांनी या घटनेविषयी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ‘सांगलीमध्ये साधू संतांना जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याचबरोबर जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराषट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष साधुंवर तत्कालीन फेसबुक लाइव्ह मुखमंत्री’. असे म्हणत राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडानंतर देशभरातील साधू रस्त्यावर उतरले होते. ठाकरे सरकारने त्या साधूंवर अन्याय केला. मात्र, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये साधूंवर अन्याय होणार नाही. दोषींवर कारवाई होणारच. जरी साधूंनी कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी पोलिसांनी आरोपींविरोधीत तक्रार नोंदवून योग्य कारवाई करावी, अशी मागणी राम कदमांनी केली आहे.
सांगली मध्ये साधू संता सोबत जी दुर्दैवी मारहाण झाली .. त्याच्यबरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे..
महाराषट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही..
पालघर हत्याकांडात निर्दोष साधुंवर तत्कालीन फेसबुक लाइव्ह मुखमंत्री
— Ram Kadam (@ramkadam) September 14, 2022
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून पंढरपूर मार्गे निघाले. मात्र, तत्पूर्वी त्यांनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केली.
साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.