सांगली : सांगलीच्या राजकारणातून (Sangli Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे सांगली जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण बदलणार आहे. एकप्रकारे अजित पवारांनी जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना चेकमेट केले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काय घडलं नेमकं सांगलीमध्ये ? आज सांगली जिल्ह्यातील (Sangli Politics) पाच दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवारांचे घड्याळ हाती घेतले आहे. यामध्ये चार माजी आमदारांसह एक जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींसह अनेकांचा समावेश आहे. यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी आमदार अजित घोरपडे, शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक,आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यासह जतचे माजी सभापती तमन्नगौडा रवी पाटील यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पाडला. सांगलीत राष्ट्रवादी भक्कम करण्यात ‘या’ नेत्यांचा मोठा वाटा विलासराव जगताप,राजेंद्रअण्णा देशमुख,अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक,या चारही नेत्यांचं आपल्या तालुक्यात मोठे प्राबल्य आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आर.आर.पाटील आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस याच नेत्यांमुळे भक्कम झाली होती,मात्र कालांतराने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता. पाचही नेत्यांची अजित पवारांना साथ या नेत्यांबद्दल बोलायचे झाले तर विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात काम केलं,तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांना साथ दिली,तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते,तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. तर भाजपातून बंडखोरी करत तमनगौडा रवीपाटील यांनी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता या पाचही नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना अजित पवारांकडून चेकमेट जत मधला राष्ट्रवादी अजित पवार गटातील विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांचा पक्षप्रवेश हा महत्त्वाचा मानला जातो.अजित पवारांनी सांगली जिल्ह्यात आपली पावर वाढवताना,त्यांचे विरोधक मानले जाणारे आमदार गोपीचंद पडळकरांना देखील शह देण्याचा प्रयत्न केला. जत विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता,तर तमनगौडा रवी पाटील यांच्या ऐवजी भाजपाने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली,त्यामुळे तमनगौडा रवी पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे पडळकरांच्या विरोधकांना ताकद देऊन अजित पवार राजकीय खेळी खेळू शकतात. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये (Sangli Politics) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिले,मात्र आता जयंत पाटील यांना देखील अजित पवारांनी पाच दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून चेकमेट देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सांगली जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण बदलणार आहे.