Sangli News : सांगली हादरली! भरवस्तीत नेत्याच्या घरात घुसून गोळीबार
सांगली शहरातील (Sangli News) अभयनगर परिसरात खंडणीच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने १४ वर्षे वयाच्या वेदांत बाळू बंडगर याच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी घडली.

Sangli News : सांगली शहरातील (Sangli News) अभयनगर परिसरात खंडणीच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने १४ वर्षे वयाच्या वेदांत बाळू बंडगर याच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी घडली. घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या निरागस मुलाला गोळ्यांनी टिपण्यात आले. या घटनेने संपूर्ण सांगली शहरात हळहळ व संतापाचे वातावरण पसरले आहे.
सांगलीतील बाळू बंडगर व त्यांचे साथीदार थोरात (रा. जत) यांच्याकडून एका सराईत गुन्हेगाराने खंडणी मागण्यास (Sangli News) सुरुवात केली होती. थोरात यांच्या जत येथील घरात घुसून खंडणीची मागणी केल्याने बाळू बंडगर व थोरात हे दोघे जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. याचा सूड उगवण्यासाठी गुरुवारी सकाळी त्या सराईत गुन्हेगाराने जत येथेच बंडगर व थोरात यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो डाव फसला.
त्यानंतर संतापलेल्या गुन्हेगाराने चार ते पाच साथीदारांसह सांगलीतील अभयनगरमधील बंडगर यांच्या घरावर मोर्चा वळवला. यावेळी बाळू बंडगर यांचा नातू वेदांत घराबाहेर निवांतपणे मोबाइलवर गेम खेळत बसला होता. या निरागस मुलाला पाहताच गुन्हेगाराने थेट त्याच्या डोक्यात गोळी झाडली आणि वेदांतने जागीच प्राण सोडला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा वाद दोन कारणांमुळे पेटला होता. त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील टेंडर घेण्यावरून उदभवलेला वाद आणि थोरात यांच्याकडून खंडणी वसुली (Sangli News) करण्यावरून सुरू असलेला वाद. या दोन्ही वादांतून सराईत गुन्हेगाराने बंडगर कुटुंबावर सूड उगवण्याचा निर्णय घेतला व निरपराध वेदांतला त्याचा बळी ठरवले.
घटनेची माहिती मिळताच सांगलीत एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा व संजयनगर पोलिसांची वेगवेगळी पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तपासाला गती दिली आहे.
एक निरागस जीव गेला…
खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार देणे हाच काय तो आजोबांचा गुन्हा — आणि त्याची किंमत चुकवावी लागली त्यांच्या १४ वर्षीय निरागस नातवाला. घराबाहेर गेम खेळणाऱ्या वेदांतला त्याच्या मृत्यूची कल्पनाही नसेल. या घटनेने संपूर्ण सांगली शहर हळहळले असून संशयितांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






