सांगली – गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेच्या आवाजाने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठेएकंद आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली आहे. शेखर पवाशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) अशी डीजेच्या असह्य आवाजामुळे ह्रदयविकाराच्या त्रासाने मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुधारी येथील प्रवीण यांचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळई सात वाजताच्या सुमारास ते कामावरून घरी परतले. घरी परतताना रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यांना काही अंतर ढकलत दुचाकी आणावी लागली. घरी पोहोचताच परिसरात सुरु असलेल्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ते सहभागी झाले. काही वेळ त्यांनी मित्रांसोबत मिरवणूकीत नाचण्याचा आनंद घेतला. मात्र काही वेळाना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. चक्कर येऊन खाली पडले. उपचारासाठी त्यांना तातडीने इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच डाॅक्टरांना मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत कवठेएकंद येथील शेखर हा देखील गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाला होता. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वीच त्यांची प्लॅस्टिक सर्जरी झाली होती. तरी देखील ते मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणूकीत मोठे साऊंडच्या आवाजाने त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. ते घरी परतले. घरी येताच भोवळ येऊन खाली पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांना मृत घोषित केले.
शेखर पावशे यांचे पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, साऊंडच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना त्रास होत असतो त्यामुळे अनेक ठिकाणी डीजे विरहित मिरवणूकीचा निर्णय घेतला जातो. तरीही बहुतांश ठिकाणी डीजे सर्रास वाजवले जातात. त्यांचा एवढा मोठा आवाज असतो की, त्याचा परिसरातील वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, ह्रदयविकाराचे रुग्ण यांना मोठा त्रास होतो. अनेकांना मृत्यूला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे गणपती मंडळांनी डीजे विरहीत मिरवणूका काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डीजे ऐवजी पारंपारिक वाद्ये, ढोल, ताशा अशा वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढावी. जेणेकरून आपल्या आनंद घेण्याच्या नादात कोणाचा नाहक मृत्यू होऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते.