आळंदी : प्रभाग क्र. १० ब: ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकृत उमेदवार संगीता राहुल चव्हाण यांनी केवळ आश्वासने नव्हे, तर कृती आणि समर्पण या बळावर आपल्या उमेदवारीची पावती दिली आहे. त्यांचे पती, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्यासह त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेतला आहे. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. देहूफाटा ते पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी यशस्वी पाठपुरावा असो, वीज समस्यांचा निपटारा असो, की वारकऱ्यांसाठी सुरू केलेली मोफत रुग्णवाहिका सेवा असो – ही सर्व कामे त्यांच्या समर्पण वृत्तीची साक्ष देतात. काळे कॉलनीतील ड्रेनेजसाठी निधी मंजूर करून दुर्गंधीतून मुक्ती मिळवून देणे आणि आळंदीजवळ होणाऱ्या कत्तल खाण्याला कडाडून विरोध करून ते थांबवणे, हे त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी आणि आस्था जपण्याचे उत्तम उदाहरण आहे. संगीता चव्हाण यांनी भविष्यातील विकासाचे जे व्हिजन (जाहीरनामा) मांडले आहे, ते अत्यंत दूरदृष्टीचे आणि सर्वसमावेशक आहे. स्वच्छ पाणीपुरवठा, सिमेंटचे आदर्श रस्ते, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट्स या मूलभूत सुविधांना त्यांनी प्राथमिकता दिली आहे. यासोबतच, महिला व बालकांसाठी विशेष योजना, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी युक्त सुरक्षा व्यवस्था आणि युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन हे त्यांचे नियोजन प्रभागाला एका आदर्श वसाहतीत रूपांतरित करेल. विशेषतः, लहुजी नगर (काळेवाडी झोपडपट्टी) पुनर्वसनाचा त्यांचा निर्धार हा सामाजिक न्यायाची त्यांची भूमिका स्पष्ट करतो. संगीता चव्हाण यांनी ‘केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो’ हे सिद्ध केले आहे. प्रभागाच्या विकासासाठी २४ तास नागरिकांच्या सेवेत हजर राहण्याचे त्यांचे वचन आहे. नगरसेवक पद महत्वाचा दुवा “नगरसेविका पद हे प्रशासन व नागरिक यातील महत्वाचा दुवा आहे. प्रभागातील मतदार माझ्यावर विश्वास दाखवून जनसेवेची संधी देतील. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचण येणार नाही. शिवसेनेतील वरिष्ठाच्या मदतीने नव्या उमेदीने विकास कामांना गती देणार आहे.” – संगिता राहुल चव्हाण, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रभागातील नागरिकांमध्ये संगिता चव्हाण यांच्या विकासकामांची तळमळ आणि आश्वासनांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात मोठी चळवळ आणि चर्चा रंगू लागली आहे.