पिंपळे गुरव – सांगवी टपाल कार्यालयात अस्वच्छता पसरली असून टपाल कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टपाल कार्यालयाला स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी होत आहे.
इथे नियमित भरणा करणाऱ्या महिला एजंट जयश्री गुमास्ते, आश्विनी खळदकर, नीलिमा पाटील, सुषमा चौधरी, मीना बोरूले, कल्पना वाघमळे यांनी टपाल कार्यालयातील समस्यांचा पाढा वाचला. सांगवी टपाल कार्यालयाच्या स्थलांतरणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे.
याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. भरणा करण्यासाठी आलेल्या महिला महिला एजंटला आणि ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते.
कार्यालयासाठीची जागा अपुरी आहे. त्यातच स्वच्छतागृहाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. कार्यालयात मनुष्यबळाची वाणवा आहे. त्यातच इंटरनेट सुविधा वारंवार कोडमडते. कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा याठिकाणी नाहीत. परिणामी महिला एजंटला पैसे भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. कार्यालय परिसरातील अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे डास, चिलटे, दुर्गंधी याचा त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार पोस्टल महिला एजंटने केली.