पाटणा : नितीश कुमारच मुख्यमंत्री राहातील, यात गोंधळ कुठे आहे. मुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त नाही. जनतेने आधी जंगलराज पाहिले आहे. परंतू 2005 नंतर त्यांनी पौर्णिमेचा चंद्र देखील पाहिला आहे, त्यामुळे मला वाटते की, नितीश यांच्याबाबतीत संभ्रम नसावा, अशी थेट प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी दिली आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सोमवारी भाजप नेते सम्राट चौधरी यांनी निकालानंतर नितीशच मुख्यमंत्रीपदावर राहतील असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राजदवर देखील निशाना साधला. ते म्हणाले की, बिहारमध्ये राजद गोंधळलेल्या स्थितीमध्ये व विखुरलेला दिसून आला आहे. राजदचे तेजस्वी यादव हे जानेवारीपासून विविध घोषणा करत असून विविध जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. लालू यांचे कुटुंब हे लूटमार, अराजकता व भ्रष्टाचार यासाठी ओळखले जाते. पराभवाच्या भितीनेच राजदचे लोक निवडणूक आयोग, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. राजद बिहारच्या लढईमध्ये कुठेच दिसून आलेला नाही तर कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आता आधीच मतचोरीचा नारा देत आहेत, असे म्हणताना चौधरी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.