मध्य प्रदेशात पुन्हा “व्यापमं’ घोटाळा; पटवारी परीक्षेत एकाच केंद्र 7 टॉप उमेदवार

भोपाळ – मध्य प्रदेशातील भरतीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाचे (व्यापमं) नाव बदलून व्यावसायिक परीक्षा मंडळ (पीईबी) करण्यात आले असले तरी घोटाळ्याची प्रकरणे अजूनही समोर येत आहेत. मध्य प्रदेशात आणखी एक भरती घोटाळा झाल्याचा दावा केला जात आहे. ताजे प्रकरण पटवारी भरतीशी संबंधित आहे. ग्वाल्हेरच्या कथित भाजप नेत्याच्या कॉलेजच्या गुणवत्ता यादीत बहुतांश अर्जदारांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे.
पटवारी भरतीमध्ये सत्ताधारी पक्ष भाजपच्या एका आमदाराच्या परीक्षा केंद्रातून केवळ 114 उमेदवारांची निवड झाली नाही, तर पहिल्या दहामध्ये 7 उमेदवार या केंद्रातून आले आहेत. सर्व ‘टॉपर्स’च्या जवळपास सारख्याच गुणांमुळे अनियमिततेची शक्यता बळावली आहे.
संजीव सिंह कुशवाह असे वादात सापडलेल्या भाजप आमदाराचे नाव आहे. ते भिंडचे प्रतिनिधित्त्व करतात. तसेच ग्वाल्हेरमध्ये एनआरआय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट चालवते. मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने गेल्या मार्च-एप्रिलमध्ये गट-2 (उप गट-4) आणि पटवारी भरती परीक्षा घेतली होती. त्याचे निकाल आले आहेत. निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी कर्मचारी निवड मंडळाने घेतलेल्या गट 2 , उप गट 4 ची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर याला ‘व्यापम-2 घोटाळा’ असे संबोधले आहे. अरुण यादव यांनी ट्विट करून परीक्षा, भाजप आमदार आणि शिवराज सरकारला गोत्यात टाकले आहे.
विरोधी पक्ष कॉंग्रेस, तरुणांच्या सक्रिय गटाने सोशल मीडियावर भरती घोटाळा उघडकीस आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे, परंतु अद्याप कर्मचारी निवड मंडळ आणि मध्य प्रदेश सरकारने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. परीक्षा रद्द करून ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.





