मुंबई – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला काळवीटाच्या घटनेबद्दल बिष्णोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जेलमधून दिला होता. यानंतर सलमान खानला अलीकडेच ई-मेलद्वारे धमक्या आल्या होत्या. अशात सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती. या सर्व घटनांवर स्वःताह सलमान खानने माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली नसली तर सध्या सलमानच्या जवळच्या मित्रांकडून याबाबत प्रतिक्रिया आली आहे.
सलमान खानच्या जवळच्या मित्राच्या मते,’सलमान अशा धमक्यांना घाबरत नाही. त्याला मुक्तपणे आयुष्य जगायला आवडते. सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितले की, या गोष्टींमुळे सलमानला काही फरक पडत नाही. सलमान ही धमकी अगदी नॉर्मल पद्धतीने घेत आहे. सलमान खान कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर कोणीही येऊ देत नाही. सलमानचे वडील सलीम खानही खूप शांत दिसत आहे.’
सलमानचे असे मत आहे , ‘जेव्हा व्हायचे असते तेव्हा ते होईल…धमकी देणाऱ्याला घाबरून त्याला आपण जास्त महत्त्व देतो त्यामुळे अशा धमकी देणाऱ्यांना कधीही घाबरू नये. भीतीपोटी तुम्ही जितकी सुरक्षा वाढवाल धमकी देणारा स्वःताला तितकाच पॉवरफुल समजेल.’ असेही सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितले. दरम्यान, ईदला रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी चित्रपटाच्या कामाच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.