मॉस्को : सर्व स्वरुपातील दहशतवादाप्रती जगाने शून्य सहिष्णूतेचे धोरण दर्शवणे आणि आपल्या कृतीतून प्रतिबिंबीत करणे गरजेचे आहे. दहशतवादाचे कोणतेही समर्थन केले जाऊ शकत नाही, त्याकडे डोळे झाक केली जाऊ शकत नाही किंवा दोष लपवण्यासाठी सावरासावर देखील केली जाऊ शकत नाही. दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा भारताला अधिकार आहे. हा अधिकार भारत वापरेल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. मॉस्को येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. जगाच्या विकसित होणाऱ्या, व्यापक अजेंड्यानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार एससीओने बदलायला हवे. तसेच आपल्या कार्यपद्धतीमध्येही सुधारणा करायला हव्यात. या बदलत्या उद्दिष्टांसाठी भारत पुर्णपणे आणि सकारात्मक योगदान देईल, अशी ग्वाहीही जयशंकर यांनी यावेळी दिली. दहशतवाद, विभाजनवाद आणि कट्टरवाद या ३ वाईट गष्टींचा मुकाबला करण्यासाठी एससीओची स्थापना झाली आहे, हे विसरून चालणार नाही. अलिकडच्या काळात हे धोके अधिकच गंभीर बनले आहेत, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. जगाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीकडे आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या गरजेवरही त्यांनी विशेष भर दिला. २००१ मध्ये शांघाय येथे झालेल्या शिखर परिषदेत रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांनी एससीओची स्थापना केली आहे. भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये त्याचे स्थायी सदस्य बनले. तर जुलै २०२३ मध्ये इराण नवीन स्थायी सदस्य बनला.