नवी दिल्ली: भारताने “नेबरहूड फर्स्ट’ (शेजारी प्रथम) नितीअंतर्गत आपल्या शेजारी देशांबरोबरील संबंधांना नवी उंची देण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक शेजारी असा आहे. जेथून रोज नवेनवे आव्हान समोर येत आहे. त्याचबरोबर भारताचा आवाज आता जागतिक मंचावर पूर्वीपेक्षा अधिक ऐकला जात असून आता भारताला जागतीक मंचावर अधिक महत्व प्राप्त झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
जयशंकर यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांतील आपल्या मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी म्हटले की, पहिल्या 100 दिवसांत आम्ही “शेजारी प्रथम’च्या नितीला पुढे नेले. या नितीअंतर्गत आम्ही शेजारी देशांबरोबर कनेक्टिविटी, कॉमर्स, कॉन्टेस्टला प्रोत्साहन देतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला विदेश दौरा हा मालदीवपासून सुरु केला. ते श्रीलंका आणि भुतानलाही गेले. मी स्वतः भुतान, मालदीव, बांगलादेश आणि नेपाळला गेलो. आता आमचा म्यानमार, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा दौरा होईल.
यावेळी ते पुढे म्हणाले की, एका शेजाऱ्याकडून (पाकिस्तान) वेगळ्या पद्धतीचे आव्हान मिळत असते. त्यामुळे जोपर्यंत सीमेपलीकडून दहशतवादावर लगाम लावला जात नाही. तोपर्यंत त्यांच्याशी संबंध सुधारणे एक आव्हान असेल. कलम 370 हटवल्यानंतर सीमेपलीकडून दहशतवादासारख्या मुद्यांवर भारताला विविध देशांचा पाठिंबा मिळत आहे. भारताच्या परराष्ट्र नितीचे हे यश आहे.
भारताच्या विदेश नितीने आधीच्या सरकारांपेक्षा विदेश नितीमध्ये नवे वळण घेतले आहे. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त विदेश मंत्रालयाने त्यांच्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली. मोदी सरकारच्या विदेश नितीचा आकार वाढला असल्याचेही ते म्हणाले.