शिरूर : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर) परिसरात दोन शेतकऱ्यांनी कष्टाचे पीक फुलत असताना मध्यरात्रीच्या अंधारात घडलेल्या अमानुष प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टात जमीन-वाटपाचा विषय प्रलंबित असतानाच सख्ख्या भावानेच दोन भावांच्या शेतातील तब्बल १३०० डाळिंब झाडे तोडून नासधूस करण्यात आली. ही झाडे शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात या दोन भावांची असून, रात्रीच्या वेळी त्यांचा सक्का भाऊ बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी झाडे तोडल्या ची लेखी तक्रार शिरूर पोलीस स्टेशन येथे केली आहे. या घटनेने शरदवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. शहाजी व दिलीप थोरात यांनी चार वर्षांपूर्वी भगवा जातीची १३०० रोपे सुमारे तीन एकर क्षेत्रावर लावली होती. लाखो रुपयांचा खर्च करून ही झाडे त्यांनी मनापासून वाढवली. सध्या या डाळिंब पिकाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली होती आणि पुढील दोन महिन्यांत काढणी अपेक्षित होती. परंतु शुक्रवारी मध्यरात्री शेतात घुसून सर्व १३०० झाडे मूळासकट तोडली, अशी धक्कादायक माहिती शेतकरी थोरात यांनी दिली. या तोडफोडीमुळे गत चार वर्षांचा परिश्रम, खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याचा पूर्णपणे विनाश झाला आहे.लागवड, सिंचन, खतांची गुंतवणूक, मजूर खर्च, औषध फवारणी ते निगा या सर्वांचा विचार करता शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठे भांडवल खर्च केले होते. या सर्वाची गणना करताना अंदाजे ४० ते ४५लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी शहाजी आणि दिलीप थोरात यांनी सांगितले. सध्या शेतमालाला योग्य भाव नाही. कांदा, भाजीपाला यांचे दर कोसळलेले. अशातच एवढे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर जबरदस्त परिणाम झाला आहे. सदर शेतजमिनीचा वाटपाचा विषय कोर्टात प्रलंबित आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नसतानाही झाडे तोडून टाकणे हा न्याय व कायद्याचा अवमान ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी थेट आरोप केला आहे की, आमचा भाऊ “बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी मध्यरात्री येऊन झाडांची निर्दयीपणे तोडफोड केली.” ही घटना उघडकीस आल्यानंतर जांबुत–शरदवाडी परिसरातील सर्व शेतकरी व नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, दोषींवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्यावी. अशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा उपाय करावेत. आमचे चार वर्षांचे श्रम एका रात्रीत संपले “चार वर्षे आम्ही या झाडांना लेकरांसारखी वाढवले… आता फळधारणा झाली होती. तीन महिन्यात पीक हातात येणार होते. पण रात्रीच्यावेळी येऊन भावानेच निर्दयीपणे १३०० झाडे तोडली. आमचे चार वर्षांचे स्वप्न एका क्षणात संपले.” असे उद्गार शहाजी व दिलीप थोरात यांनी काढले ही घटना केवळ दोन शेतकऱ्यांचे नुकसान नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस व महसूल विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.