महाड – मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस ही रत्नागिरीहून मुंबईकडे येत होती.
या बसमधून १९ प्रवासी प्रवास करत होते. तर दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनर असे मिळून २२ प्रवासी होते. ही बस महाडजवळ सावित्री नदीवर असलेल्या पुलजवळ आली असताना तिने पेट घेतला. रात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बसचा टायर पेटत असत्याचे लक्षात येताच त्याने इतर प्रवाशांना त्याची कल्पना दिली आणि वेळीच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मात्र बसला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाले.
काही वेळात अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. मात्र बस जवळपास पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.