पिंपरी – पिंपरी- चिंचवड महापालिकेत एक वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र, प्रशासकीय राजवटीत पालिकेचा सर्व कारभार हा अलबेल असाच सुरू आहे. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत. विभागप्रमुखांचे नियंत्रण नसल्याने कर्मचारी वेळेत जागेवर आसनस्थ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यापुढे विभागप्रमुखांनी दररोज हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच सर्व विभागांचे हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी केली. सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली नव्हती. फिरतीवरुन आल्यानंतर परत आल्याची वेळ, स्वाक्षरी केली नाही. रजिस्टर प्रमाणित केले नाही. फिरतीमधील नोंदी नोंदणी प्रमाणित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केल्याचे दिसून आले नाही. यावरुन विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांची हजेरी पत्रकावरील उपस्थिती, फिरती रजिस्टर दररोज तपासण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
विभाग प्रमुखांचे प्रभावी नियंत्रण नसल्याने विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. कार्यालयीन कामकाज वेगात होण्यासाठी शिस्तीचे स्वयंपालन करणे, शिस्तीचे पालन करुन घेणे हे विभागप्रमुखांचे कर्तव्य आहे. यासाठी त्यांना आवश्यक ते अधिकार प्राप्त आहेत. यापुढे विभागप्रमुखांनी दररोज हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी करुन साक्षांकित करावी. कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारे, गणवेश परिधान न करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल 31 मार्च 2023 पर्यंत प्रशासनाला सादर करावा, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
आयुक्तांचाही वचक संपुष्टात
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. येत्या 13 मार्चला प्रशासकीय राजवटीला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी गणवेश बंधनकारक केला होता. मात्र, त्यांची बदली होताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गणवेश घालणे बंद केले आहे. आयुक्त शेखर सिंह यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांत वचक नसून बेशिस्तपणा सुरू झाला आहे. अनेक अधिकारी साइट व्हिजिटच्या नावाखाली मुख्यालयातून गायब असतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त सिंह यांनी कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.