‘शिंदे, अजित पवारांच्या जागा कमी करण्याचा भाजपचाचं डाव!’ फडणवीस, शहांचं नाव घेत पवारांचा गंभीर आरोप…

महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील सत्तास्थिती बदलण्याचे डावपेच आखले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात फडणवीस यांना पुढे करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याची खेळी भाजपने आखल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या रणनीतीबद्दल बोलताना पवार म्हणाले, “भाजपला शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागा कमी करून स्वत:च्या जागा वाढवायच्या आहेत.” पवारांच्या मतानुसार, ही रणनिती महाविकास आघाडीच्या बाजूने फायद्याची ठरेल आणि भाजपच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना यश मिळवता येणार नाही.
“देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केल्यास भाजपला पाच ते सात टक्के मते गमवावी लागू शकतात,” असा ठाम दावा देखील त्यांनी करमाळ्यात बोलताना केला.
फडणवीसांवर घणाघात
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पवारांनी त्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. “फडणवीस स्वतःला अभिमन्यू म्हणवून घेतात, मात्र प्रत्यक्षात ते जनरल डायरसारखे आहेत. गोरगरीब महिला, मुलांवर वारकऱ्यांवर लाठीचार्ज करून त्यांनी जनतेवर अन्याय केला आहे,” असे तीव्र शब्दांत पवारांनी सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेला महागाई, बेरोजगारी, आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकवणारे भाजप नेते म्हणून फडणवीसांना रोहित पवारांनी टीकेचे लक्ष्य केले.
बारामतीत राष्ट्रवादीची भक्कम ताकद
बारामतीतील निवडणूक तोंडावर असताना पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांचा थेट सहभाग असल्याने युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. “महाविकास आघाडीत विविध जागांवर एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोरी कमी करण्यासाठी सर्व वरिष्ठ नेते मैदानात उतरले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपसाठी धोक्याची घंटा
मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत रोहित पवार यांनी टिप्पणी करताना, “जरांगे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांच्या निर्णयाचे आदराने स्वागत केले जाईल,” असे मत व्यक्त केले. भाजपच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत, “भाजपला मुद्द्यांवर आधारित राजकारण करता येत नाही. त्यांच्या सत्तेत महाराष्ट्राचीच हानी होते,” असे सांगितले. यावेळी महाविकास आघाडीला १७० ते १८० जागा मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले.
महाविकास आघाडीची रणनीती
महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना मोठे यश मिळण्याचा विश्वास पवारांनी व्यक्त केला. “यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपला आपल्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.




