RMC Plant Action – गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नदीकाठावर भर लोकवस्तीजवळ असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता नगर रस्ता परिसरातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला. मात्र, ही कारवाई करणाऱ्या पथकाला १५ प्रकल्प पाडण्याचे आदेश दिले असताना केवळ सातच प्रकल्प पाडण्यात आले आहेत, तसेच दोन प्रकल्पांना सील ठोकून उर्वरीत सहा प्रकल्पांवरील कारवाई वरिष्ठांच्या आदेशानंतर थांबविल्याची कबुली महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेच दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेमकी कोणाच्या आदेशावरून ही कारवाई थांबवली, यावरून महापालिकेत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कारवाई दरम्यान एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीने अधिकाऱ्यांना जाब विचारत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतरही काही वेळातच वरिष्ठ स्तरावरून आलेल्या संदेशानंतर कारवाई थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावरही कारवाई नाही नगर रस्ता परिसरातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आल्यानंतर अतिक्रमण विभागास सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात असलेल्या आरएमसी प्रकल्पांवर पुढील टप्प्यात कारवाई करण्यात येणार होती. मात्र, कारवाईला निघण्यापूर्वीच अतिक्रमण विभागास सिंहगड रस्त्यावरील प्रकल्पांवर कारवाई करू नये, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याने या प्रकल्पांमुळे धूळ, आवाज आणि जड वाहनांच्या वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या तक्रारीनंतर महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वाहतूक विभागाकडून संयुक्त कारवाई अपेक्षित असताना कारवाई थांबविल्याने महापालिका प्रशासनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. “आरएमसी प्रकल्पावर कारवाई सुरू असताना अचानक वरिष्ठांकडून संदेश आला. त्यानुसार कारवाई थांबविण्यात आली.” – सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण विभाग