नेवासा – करोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महिना झाला अजून किती दिवस लॉकडाऊन राहील याचा अंदाजनाही. त्याचा परिणाम शेतीकामासह पीक विक्रीवर झाला. पिके चांगली आली परंतु पिकविले पण विकले जाईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कर्जबाजारीपणामुळे अधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा करोनामुळे संकटात सापडला. हॉटस्पॉट केंद्र जाहीर झाल्यामुळे बॅंका बंद असल्याने बॅंकेतील पैसे काढता येत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडून बळीराजाची राजा असून भिकारी अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
संकट काय शेतकऱ्यांचा पाठलाग सोडायला तयार नाही.
अगोदर दुष्काळाने अडचणीत आलेला शेतकरी समाधानकारक पाऊस झाल्याने समाधानी होता. त्यावर त्याने आपल्या स्वप्नाचे इमले बांधण्यास सुरवात केली होती. पण करोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला. लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सुगीच्या दिवसातच करोनाने धुमाकूळ घातला.करोना साथीला सुरुवात झाली. त्यावेळी ज्वारी, गहू, हरभरा काढण्याची कामे सुरू होती. करोनाच्या भीतीने मजूरसुद्धा मिळण्यास अडचणी आल्या.
शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येतात. मात्र, शेतमाल कुठे विकायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. कमी दिवसात आणि उन्हाळ्यात भाजीपाला, काकडी, कलिंगड आणि खरबूज जादा पैसे मिळवणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली. मात्र, ऐन विक्रीत त्याला ग्राहक मिळत नाही. तयार माल व भाजीपाला कोठे पाठवणे शक्य नाही. स्थानिक ठिकाणी मोठा ग्राहक वर्ग नाही. योग्य भाव नसल्याने हातात आलेले पीक काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतात सडून जात आहे तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनवरे सोडली आहेत.हातात आलेली पिके मातीत गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जे काही पिकलं आहे ते कोठे विकावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडून शेतकरी हतबल झाला आहे. बॅंकेत ठेवलेले दोन पैसे उपयोगी येतील, असे वाटत असताना शहरातील सर्व जीवनावश्यक सेवाबरोबर बॅंकाही बंद असल्याने पैसा काढता येईनात, या समस्येत प्रशासनाने लक्ष्य घालून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे